चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील कोलारा (तु.) ग्रामपंचायतीत सचिव, सरपंच आणि सदस्य मनमानी कारभार करीत असून, विविध कामात गैरव्यवहार करण्यात येत आहे. त्यामुळे येथील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली. .ही दिवसांपूर्वी संतप्त नागरिकांनी जिप्सी प्रकरणावरून ग्रामपंचायतला कुलूप ठोकले होते. त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी चोख बंदोबस्त लावून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. यानंतर परत ग्रामस्थांनी येथील सचिवासह पदाधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. कोलारा गेटवर सुरू असलेल्या जिप्सी बंद करून सरपंच आणि काही सदस्यांनी स्व:तच्या मालकीची जिप्सी लावली होती. यासाठी ग्रामसभेची कोणतीही परवानगी घेतली नाही. ग्रामसभेतील ठरावात परस्पर बदल करण्यात आले. ही बाब नागरिकांच्या निदर्शनास येतात गावातील नागरिकांनी मोठा रोष व्यक्त केला होता. नागरिकांच्या रोषासमोर नमते घेत नवीन चार जिप्सी बंद करण्यात आले आहे. असे असले तरी अन्य विकासकामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मनरेगाअंतर्गत शंकर सिडाम ते रतिराम डेकाटे यांच्या घरापर्यंत, मारोती येरमे ते पंचफुला कोडापे यांच्या घरापर्यंत, मधुकर मेश्राम ते बुधाराम शेंडे यांच्या घरापर्यंत आणि शांताबाई शेंडे ते दयाराम गणवीर यांच्या घरापर्यंत नुकतेच रस्त्याचे काम करण्यात आले. परंतु, या सर्व रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या रस्त्याच्या माहितीचे फलक एकाच ठिकाणी लावण्यात आले आहे. रतिराम डेकाटे यांच्या खासगी बोअरिंगचे पाणी बांधकामासाठी घेण्यात आले. त्याचे देयक काढून रक्कम परस्पर हडपण्यात आली असा आरोप यावेळी करण्यात आला. या सर्व कामाची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी काण्यात आली. पत्रकार परिषदेला रतिराम डेकाटे, दौलत वैद्य, प्रभाकर नैताम, नारायण जांभुळे आदी उपस्थित होते.



